Tuesday, March 14, 2017

मॉडरेट मिनिमलिझमचा सुवर्णमध्य

साधेपणाने, कमीत कमी वस्तुंसोबत जगण्यात जो एक अंतर्भुत शांतपणा आहे, सौंदर्य आहे, निसर्गाच्या जवळ जाणे आहे त्याकडे आकर्षित होऊन मिनिमलिस्टजीवनशैलीकडे माणसे वर्षानुवर्षे, पिढ्यान पिढ्या वळत राहिली.
मिनिमलिझमचे विचार, साधने, शिकवण पिढ्या, संस्कृतीनुसार बदलत राहिली पण त्यामागची मुळ तत्वे सारखीच होती.
आपल्या मुळांकडे, जगण्यातल्या सोपेपणाकडे वळण्याचे मानवामधले मुलभूत आकर्षण मिनिमलिझम विचारसरणीमधून प्रतिबिंबित होत राहिले.
प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमधे मिनिमलिझमचे उदयास्त होत राहिले.
माणसांच्या जीवनशैलीमधे, संगितापासून ते साहित्य, कलेमधे मिनिमलिझमच्या पाऊलखूणा उमटत राहिल्या.

आधुनिक जगात तर हे आकर्षण किती तीव्र झाले, त्याकरता नवनवीन वाटा कशा आणि कोणत्या शोधल्या गेल्या, जाताहेत हे आपण पाहिलेच आहे.
लहान, साधी घरे बांधून त्यात केवळ जीवनावश्यक वस्तुंसोबत जगणे असो, पर्यावरणप्रेमी जीवनशैली अंगिकारणे असो, झेन तत्वांचा वापर असो, पाठीवरच्या पिशवीत मावेल इतकेच सामान सोबत घेऊन जगभरात भटकणे असो, चैनीच्या वस्तू, खरेदीचा त्याग करणे असो.. अनेक पद्धती, अनेक कहाण्या..

साधेपणाने, अडगळविरहित जगण्यात असे काहितरी विलक्षण प्रेरणादायी आहे ज्याचे प्रत्येक थरातल्या, संस्कृतीतल्या माणसाला सातत्याने आकर्षण वाटत राहिले. पैसे वाचणे, वेळ वाचणे अशा भौतिक फ़ायद्यांपासून ते मन:शांती, एकाग्रता वाढणे अशा मानसिक फ़ायद्यांपर्यंत अनेक असल्याने त्याचा स्विकार होत राहिला.
जगण्याचा झगडा ते अति मुबलकता या दोन टोकांच्या दरम्यान हा मिनिमलिझम सातत्याने हेलकावत राहिला.

अती समृद्धी, चैनीतून मग पुन्हा साधेपणाकडे परत वळावेसे वाटणे, जाहिरातींच्या मा-यात, मार्केटींगच्या भुलभुलैयात सरभरलेल्या मनावर नको झालेल्या, जागण्यात अडगळ वाटू शकणा-या वस्तुचे ओझे असहनीय झाल्यावर मिनिमलिझमचा शांत, साधा रस्ता माणसाला निर्वाणाकडे नेणारा वाटणे हे साहजिकच.

अर्थात असे सर्वांनाच वाटले नाही.

कोणत्याच पिढीत, कोणत्याच संस्कृतीत मिनिमलिझम सर्वार्थाने स्विकारला गेला नाही.

मिनिमलिझम काही वर्षांनंतर, पिढ्यांनंतर पुन्हा पुन्हा डोकं वर काढत राहिला, याचाच अर्थ तो वेळोवेळी अस्तंगतही होत राहिला.
कन्झुमेरिझम पुन्हा पुन्हा मिनिमलिझमवर मात करत राहिला.

मिनिमलिझमचा विचार समाजातल्या सर्व स्तरांमधे कधीही सार्वत्रिकतेनं का स्विकारला गेला नाही याचीही कारणे पहाणे गरजेचे ठरते.

मिनिमलिझम सार्वत्रिकरित्या स्विकारला न जाण्याचे मुलभूत कारण अर्थातच आर्थिक असमतोल आणि त्यातून रुजणारी भिन्न सामाजिक मानसिकता.

माझ्याकडचे शंभर शर्ट्स, हजार पुस्तके, हजार स्क्वेअर फ़ूट घरातलं दोन ट्रकांमधे मावेल इतकं सामान कमी करुन आता मी फ़क्त पाच शर्ट्स, दहा पुस्तकं आणि पिशवीत मावेल इतक्याच सामानावर दीडशे स्क्वेअर फ़ूट जागेमधे रहातो आहे असं एखाद्याने मिनिमलिस्ट जीवनशैली जगायचे ठरवल्यावर लिहिणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने खरोखरच कष्टसाध्य आणि कौतुकास पात्र असणारे ठरत असले तरी अनेक बेघर, गरीब स्तरातील व्यक्तींच्या तुलनेत असे मिनिमलिस्ट अवस्थेतील जगणेही चैन ठरु शकते.
जीवनावश्यक वस्तु ही संकल्पना अनेकदा सापेक्ष असते. त्यामुळे मिनिमलिझमची चळवळ अनेकांच्या दृष्टीने स्टंटबाजीकिंवा फ़ॅडअशा अर्थाने घेतली गेली.

मिनिमलिझम ही संकल्पना मुबलकतेच्या अतिरेकातून आली असल्याने त्याचा वापर समाजाच्या एका विशिष्ट स्तरापर्यंतच मर्यादित असतो, मिनिमलिझम संकल्पना हा श्रीमंत, जास्त पर्याय निवडण्याची मुभा असलेल्यांकरताच आहे आणि आर्थिक दृष्ट्या गरीब गटाला मिनिमलिझमची गरजच नाही, कारण अभावात साधे जगायला लागणे ही मजबुरी असते. त्यामुळे या स्तरामधे मिनिमलिझमची गरजच नाही.

अशी ही समजूत हा मुळातच एक महत्वाचा गैरसमज आहे.

तुमच्या जवळ असलेल्या वस्तु हा मिनिमलिझमच्या गरजेचा मानक नाही.

गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला अनेकदा स्वस्त किंमतीच्या अनेक लहान सहान वस्तु जवळ बाळगाव्या लागतात, त्या लवकर खराब होत असल्याने त्यांची खरेदी वारंवार होत रहाते. त्या उलट श्रीमंत व्यक्ती कमी संख्येच्या पण अधिक किमतीच्या वस्तू दीर्घकाळ टिकणा-या वापरु शकते. त्यांना वस्तुंचा साठा करुन ठेवण्याचीही आवश्यकता नसते.

ग्राहककेंद्रित समाजामधे, जाहिरातींच्या भडिमाराचा सर्वाधिक परिणाम होणारा वर्ग हा आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावरचाच असतो. आपल्याला परवडू न शकणा-या, हव्याश्या वाटणा-या वस्तुंचा सातत्याने केला जाणारा त्यांच्या मनातला विचार हा प्रसंगी जीवनावश्यक गरजा बाजूला सारुन चैनीच्या वस्तु जमवण्याच्या मागे लागण्याइतका प्रबळ ठरतो.
टिकावू पण महाग वस्तु न परवडल्याने हा वर्ग स्वस्त, तकलादू वस्तुंच्या बाजारपेठेच्या जाळ्यात अडकतो.
मिनिमलिझमची संकल्पना त्याकरताच जरा वेगळ्या पद्धतीने पण मुळच्या गाभ्याला धक्का न लागता या वर्गापर्यंत पोचवणेही तितक्याच गरजेचे आहे.

साधेपणाचे तत्व स्विकारुन भौतिक सुखांचा, चैनीच्या वस्तुंचा त्याग करुन आयुष्य सोपेपणाने, साधेपणाने जगणारे अनेक जण वेगवेगळ्या संस्कृतींमधे पहायला मिळतात. मात्र ते कायमच अपवाद ठरलेले आहेत.

चैनीच्या, सुखकारक वस्तु आजूबाजूला विखरुन असताना, त्या विकत घेणे सहजसाध्य असताना त्यांच्याकडे पाठ फ़िरवून साधे जगायला खूप मोठा मनोनिग्रह लागतो, ते जास्त कष्टप्रद आहे.
शिवाय गरज नसलेल्या वस्तुंचा तुम्ही त्याग करा असं सांगणं सोपं आहे, पण माणसांची मनं त्यात गुंतलेली असतात, वस्तु टाकून दिल्यावरही अनेकदा ते त्याचाच विचार करत रहातात, त्यामुळे भोवतालची अडगळ दूर झाली तरी मनातली जात नाहीच.

मिनिमलिझमचे तत्व आयुष्यभर निभावणे सोपे नाही. मिनिमलिझमकडे स्वत:हून वळलेल्या आणि या विचारसरणीशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या व्यक्ती मोजक्याच आहेत.

संन्यस्त वृत्ती स्विकारणे हे या साधेपणाचा अध्यात्मिक टोक. अर्थातच ते संसाराचा पसारा मुळातच फ़ार न मांडलेल्यांनाच साध्य.
मिनिमलिझम ही संकल्पना त्या अर्थाने व्यक्तिवादी ठरते.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या संकल्पनेचा स्विकार मान्य असेलच असे नाही. आणि तशी ती नसेल तर मिनिमलिझम लादणे हा फ़ार मोठा अन्याय, तिचा टिकावही अशक्य.
आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त सुखसोयी पुरवण्याचा प्रयत्न करण्याच्या मुलभूत मानवी प्रेरणेच्या विरोधात जाणारी मिनिमलिझम संकल्पना आहे असं अनेकांना वाटतं.

आद्य मिनिमलिस्ट म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते हेन्री डेव्हिड थोरो ज्याने आपल्या आयुष्याचा बराचसा उत्तरार्ध वाल्डेनच्या तळ्याकाठी, एका लहानशा घरामधे, गरजेपुरत्या वस्तुंच्या सोबतीने एकांतात व्यतित केला तोही नंतर बरीच वर्षे आपल्या पिढीजात, भल्यामोठ्या, सुखसोयींनी युक्त अशा घरामधे घालवल्याचे इतिहास सांगतो.

म्हणजे मग मिनिमलिझम हा आपण असेही जगू शकतो इतक्याच साध्यापुरता मर्यादित ठेवायचा का?
आयुष्यभर हे व्रत निभावणं विनाजबाबदारी, स्वतंत्र, एकटेपणाने रहाणा-यांनाच जमू शकत असेल का?

मॉडरेट मिनिमलिझम या विषयावर जगभरात अनेक ठिकाणी, प्रसंगी स्वखर्चानेही व्याख्यानमाला चालवणारा स्विडिश अमेरिकन जोनार्द स्किलेट यासंदर्भात सुरेख विवेचन करतो.
माणसाला आपल्यासोबतच्या प्रत्येक वस्तुसोबत संवाद साधता यायला हवा. नाते जोडता यायला हवे. तितक्याच वस्तु सोबत असू द्या. जोनार्द सल्ला देतो की वस्तु खरेदी करताना तिची आपल्याला असलेली गरज, तिचा टिकावूपणा, आपल्यासोबत ती जास्तीत जास्त वर्षं कशी काढू शकेल हा विचार करता यायला हवा. त्याकरता वस्तुची नीट काळजी घेणंही शिकून घ्यावं. वस्तुच्या पुनर्वापराचे धडे सातत्याने गिरवायला हवे.  

ग्राहक-संस्कृतिचा, खरेदीचा अतिरेक आणि त्याचा एकंदरीतच पर्यावरणावर होणार दुष्परिणाम, नैसर्गिक स्त्रोतांवर पडणारा ताण, विल्हेवाटीची समस्या आणि सर्वात महत्वाचे अधिक कमवा-अधिक खरेदी करा या दुष्टचक्रात अडकल्यावर उद्भवणारा शारिरीक आणि मानसिक तणाव टाळायचा असेल तर मिनिमलिझम संकल्पनेला शरण जाण्यावाचून पर्याय नाही या विचाराला पाठिंबा देणारी आणि त्याचा प्रतिवाद करणारी मतं टोकाची असू शकतात पण दोन्हींचा मध्य साधण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवण्यावाचून सध्या तरी पर्याय नाहीच.  


No comments:

Post a Comment